Add parallel Print Page Options

24 “त्या सर्वशक्तिमान देवाला माणसाच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी कशा माहीत असतात?
    परंतु त्याच्या भक्तांना मात्र त्याच्याबद्दल काहीच माहीत नसते.”

“लोक शेतातली हद्द दर्शविणाऱ्या खुणा जास्त जमीन मिळवण्यासाठी सरकवतात.
    लोक पशूंचे कळप चोरुन दुसऱ्या रानात चरायला नेतात.
ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात.
    ते विधवेची गाय पळवून नेतात आणि त्यांच्या ऋणाची ती जोपर्यंत परतफेड करत नाही तोपर्यंत ती गाय आपल्याकडे ठेवून घेतात.
ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात.
    सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते.

“गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते अन्नाच्या शोधात लवकर उठतात.
    ते मुलाबाळांना अन्न देण्यासाठी रात्रीपर्यंत काम करतात.
गरीब लोकांना शेतात गवत आणि चारा कापत रात्रीपर्यंत काम करावे लागते.
    त्यांना श्रीमंतांच्या शेतातली द्राक्षे वेचावी लागतात.
त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते.
    थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते.
ते डोंगरावर पावसात भिजतात.
    थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नसते म्हणून ते मोठ्या खडकांना चिकटून बसतात.
दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आईजवळून घेतात.
    ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून ठेवून घेतात.
10 गरीबांजवळ कपडे नसतात. म्हणून काम करताना ते उघडेच असतात.
    ते दुष्टांसाठी धान्याच्या पेंढ्या वाहतात पण स्वतः मात्र उपाशीच राहतात.
11 ते आॉलिव्हचे तेल काढतात. द्राक्षाचा रस काढतात.
    व त्यासाठी द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवतात.
    परंतु त्यांच्याजवळ मात्र पिण्यासाठी काही नसते.
12 शहरात मरायला टेकलेल्या माणसांचे दु:खद रडणे ऐकू येते ते दु:खी कष्टी लोक मदतीसाठी हाका मारतात.
    परंतु देव ते ऐकत नाही.

13 “काही लोक प्रकाशाविरुद्द बंड करतात.
    देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते.
    देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही.
14 खुनी सकाळी लवकर उठतो आणि गरीब व असहाय्य लोकांना ठार मारतो.
    तो रात्रीच्या वेळी चोर बनतो.
15 ज्या माणसाला व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो.
    ‘मला कुणीही बघणार नाही’ असे त्याला वाटते, पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो.
16 रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात.
    पण दिवसा ते स्वतःला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात.
17 त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते.
    त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते.

18 “पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात.
    त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षे गोळा करु नयेत म्हणून त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो.
19 हिवाळ्यातल्या बफर्पासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते.
    त्याप्रमाणे त्या पापी लोकांना थडग्यात नेले जाते.
20 हा दुष्ट माणूस मरेल आणि त्याची आईदेखील त्याला विसरुन जाईल.
    त्याची प्रेयसी म्हणजे त्याचे शरीर खाणारे किडे असतील.
लोक त्याची आठवण ठेवणार नाहीत.
    त्यामुळे दुष्टपणा लाकडासारखा मोडून पडेल.
21 दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात
    आणि ते विधवांना मदत करायचे नाकारतात.
22 सामर्थ्यवान लोकांना नष्ट करण्यासाठी दुष्ट आपली शक्ती खर्ची घालतात.
    दुष्ट माणसे सामर्थ्यवान बनू शकतात परंतु त्यांना त्यांच्या आयुष्याची खात्री नसते.
23 दुष्टांना थोड्या वेळासाठी सुरक्षित आणि निर्धास्त वाटते.
    आपण सामर्थ्यवान व्हावे असे त्यांना वाटते.
24 दुष्ट लोक थोड्या काळापुरते यशस्वी होतात. परंतु नंतर ते जातात.
    धान्याप्रमाणे त्यांची कापणी होते, इतर लोकांप्रमाणे दुष्टांनादेखील कापले जाते.

25 “या गोष्टी खऱ्या आहेत हे मी शपथपूर्वक सांगतो.
    मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल?
    मी चुकलो हे कोण दाखवेल?”